Tuesday 29 October 2019

प. शंकरराव वैरागकर यांच्या स्वरातून निथळले भावभक्तीचे चांदणे


सुरविश्वास
नाशिक, दि. २६ : दीपावलीच्या उत्सवी आणि आनंदमयी वातावरणात सुरविश्वास ची मैफल रसिकांच्या जीवनात चैतन्य निर्माण करून गेली आणि स्वरातून निथळणारे चांदणे सोबत घेऊन स्वरपर्वाची आठवण जपुनही ठेवली असेल प्रत्येकाने 'विश्वास ग्रुप' तर्फे सुरविश्वास चे नववे पुष्प आज प. शंकरराव वैरागकर यांनी गुंफले.
सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,
मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.
ओंकार वैरागकर (तबला), सागर कुलकर्णी (संवादिनी), अथर्व वैरागकर, ईश्वरी वैरागकर (स्वरसाथ), प्रसाद शेळके (पखवाज), अन्नपूर्णा सौन्दाने (टाळ ) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले .
अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास गार्डन शेजारी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. विश्वास ग्रृप चे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून, संकल्पना विनायक रानडे यांची आहे.
मैफिलीची सुरुवात रागभैरव रागाने केली. विलंबित बडा ख्याल चे शब्द होते 'बलमवा मोरे सैय्या'. मैत्रीपूर्ण नात्याची वीण उसवतानाच आतला प्रेमाचा झरा कितीही संकटे येऊ दे त्यात तूझ माझ नाते चिरंतन आहे हाच सुर यात होता. त्यानंतर छोटा ख्याल  सादर केला. एक तालात 'हर हर महादेव' यातून परमेश्वराची आराधना करत भावभक्तीच दर्शन समोर आले.
यानंतर ठुमरी सादर केली. 'याद पिया की आये' या शब्दांतून आर्त जाणीव व्यक्त केली. या आर्तपूर्ण स्वरांनंतर किरवाणी रागातील भजन सादर केले. 'जगत मे झूटी देखी प्रीत' प्रीतीच इतककं परखड दर्शन स्वरांतून नवा विचार देऊन गेले. मैफिलीचा समारोप 'वैकुंठीचा राया' या भैरवीने झाला. त्यात रसिक चिंब भिजले नसते तर नवलच.
कार्यक्रमात विविध भागात उल्लेखनीय कार्यबद्दल मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. त्यात महाराष्ट्र गोवा बार कोन्सिल अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अॅड. अविनाश भिडे यांचा, कविताच माझी कबरसंग्रहाच्या २१ पुरस्कारांबद्दल कवी संजय चौधरी यांचा तर 'चित्रवेध' काव्य पुरस्काराबद्दल तन्वी अमित यांचा सन्मान शंकरराव वैरागकर यांचे हस्ते करण्यात आला. कलावंतांचा सन्मान रमेश देशमुख, डॉ. मनोज शिंपी, सतीश गायधनी, शिल्पा कवीश्वर, विनायक देवधर, मिलिंद धटिंगण, माधुरी कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आला.






No comments:

Post a Comment