Monday 2 September 2019

कोकणातील विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वात भाषेचा गोडवा अधिक - शेखर निकम


महाड येथील लक्ष्मण कचरे रत्नागिरी विभागीय फेरीचा मानकरी

दि.३० (चिपळूण) : वक्तृत्व कलेत भाषेचा वापर हा अतिशय महत्वाचा असतो. वाचन,चिंतन व संवादातून तुमची भाषेबद्दलची समज अधिक समृद्ध होत जाते. कोकणाला विचारवंत, लेखक, साहित्यिक, राजकीय वक्ते यांची मोठी परंपरा आहे आणि कोकणात बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेचाही एक वेगळा गोडवा आहे. तोच गोडवा आजच्या पिढीतील वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही कायम आहे असे मत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र चिपळूण चे अध्यक्ष शेखर निकम यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियान व सह्याद्री शिक्षण संस्थेचे महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. चिपळून येथे शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट २०१९ रोजी, सकाळी १० वा. मुख्य सभागृह, सह्याद्री शिक्षण संस्थेचे महिला विद्यालय, चिपळूण येथे विभागीय फेरी संपन्न झाली. याप्रसंगी निकम बोलत होते. या स्पर्धेत रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या तीन जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेला परीक्षक म्हणून प्राचार्य डॉ. टी वाय. कांबळे व प्रा. महेश अचिंतलवार यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक - लक्ष्मण विठ्ठल कचरे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड, जि. रायगड,
द्वितीय क्रमांक - प्रतीक प्रभाकर गमरे, डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालय, मार्गताम्हाणे,
तृतीय क्रमांक - संकेत जयंत लाड, शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, दहिवली,
उत्तेजनार्थ क्रमांक - अनिकेत विनायक कांगणे, गोखटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी व कौस्तुभ हेमंत फाटक, देव घैसास किर वरिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे राज्य संघटक नीलेश राऊत, विभागीय केंद्र रत्नागिरीचे सचिव अभिजीत खानविलकर,
विश्वनाथ कांबळे, सुनील घोडेकर, संदेश संसारे आदींनी परिश्रम घेतले.






No comments:

Post a Comment