Monday 2 September 2019

भाषण पाठांतर करून नाही,तर आत्मसात करून करा : चंद्रकांत कुलकर्णी


यशवंत शब्दगौरव मुंबई विभागीय फेरीची प्राची जोशी मानकरी !

दि. ३१ (मुंबई) : भाषणकला तुमचे आयुष्य घडवते परंतु पाठांतर करून बोलणे म्हणजे भाषण नव्हे, भाषण करतांना तुमचे विचार आणि भूमिका स्पष्टपणे दिसल्या पाहिजे. त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व उभे राहते. तुमच्या व्यक्तिमत्वात ठामपणा येतो. आताच्या सोशल मीडियावरील ट्रोलर्स च्या काळात तुमच्यातील ठामपणा आणि विवेकी विचारांची गरज आहे. ती अंमलात आणा, तुमच्या मनातील विचार हे भाषण कलेतून मांडा, पाठांतर करून नव्हे, असे आवाहन प्रसिद्ध नाट्य-चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई-नवमहाराष्ट्र युवा अभियान व मराठी विभाग, रामनारायन रुईया स्वायत्त महाविद्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या मुंबई विभागीय फेरीच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.मनीष हाटे, नवमहाराष्ट्र्र युवा अभियानाचे संयोजक दत्ता बाळसराफ, मराठी विभागाच्या प्रमुख डॉ. लीना केदारे, विजय कसबे उपस्थित होते.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे व पालघर या चार जिल्ह्यातील ८० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पर्धेत परीक्षक म्हणून जयदेवी स्वामी, दीपा कदम, अस्मिता मोहिते, महेश अचिंतलवार यांनी काम पाहिले.
स्पर्धेच्या मुंबई विभागीय फेरीचा निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक : प्राची श्रीकांत जोशी, के. व्ही. पेंढारकर महाविद्यालय, डोंबिवली,
द्वितीय क्रमांक : अभिजीत जाधव, सी. एच. एम. महाविद्यालय, उल्हासनगर,
तृतीय क्रमांक : प्रतीक पवार, रुईया महाविद्यालय, माटुंगा,
उत्तेजनार्थ : प्राजक्ता जाधव, रुईया महाविद्यालय व
प्रचिती परब, डी.जी. रुपारेल महाविद्यालय
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे राज्य संघटक नीलेश राऊत, अनघा पेंडसे, रमेश मोरे, मनीषा खिल्लारे, डॉ. अमित नागरे, मीनल सावंत, विवेक कनावजे, महेश साळवी, रणजीत बायस आदींनी परिश्रम घेतले.







No comments:

Post a Comment