Monday, 13 January 2020

विधी साक्षरता कार्यशाळा संपन्न...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम व जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खर्डी, वळखण, ता. शहापूर, जि. ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ११ जानेवारी रोजी मोफत एक दिवसीय विधी साक्षरता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला उपस्थितांकडून संविधान सरनाम्याचे सामूहिक वाचन करवून घेण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना कार्यशाळेचे प्रमाणपत्र देण्यात आले.






Sunday, 12 January 2020

इलेक्ट्रीकल आणि सेफ्टी ऑडिट वर व्याख्यान...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे इलेक्ट्रीकल आणि सेफ्टी ऑडिट या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रकाश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. शॉक लागणे, शॉटसर्कीट होणे, लिफ्ट मध्ये होणारे अपघात अशा अनेक दैनंदिन जीवनातील गोष्टींवर त्यांनी माहिती दिली आणि आपण काय खबरदारी घेतली पाहिजे यावबद्दल मार्गदर्शन सुद्धा केले.





मराठी भाषेविषयी प्रत्येकाने संवेदनशील असण्याची गरज


मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त व्याख्यान संपन्न
मराठी भाषेविषयी प्रत्येकाने संवेदनशील असण्याची गरज
                                                                                                - स्वानंद बेदरकर
नाशिक (दि. ११) : आज मराठी भाषेच्या वापराबाबत समाज पुरेशा प्रमाणात संवेदनशील नसून व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकमुळे भाषेचा नेमका आणि अर्थवाही  वापर करणे लोक विसरत आहेत आणि त्यातून संवाद, आत्मीयता, आपलेपणा हरवून जात आहे. चिन्हांची भाषा उदयास येत असून व्यक्त होण्यासाठी अशा प्रकारची माध्यमे तोकडी ठरत आहेत. त्यासाठी मराठी भाषेच्या परंपरेकडे, साहित्याकडे, पुन्हा जाणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक स्वानंद बेदरकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक व विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त स्वानंद बेदकर यांच्या वैभव मराठीचेया विषयांवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. सदर कार्यक्रम विश्वास हब येथे संपन्न झाला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन यांचे सहकार्य लाभले.
श्री. बेदरकर म्हणाले की, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत सावता माळी, रामदास स्वामी या थोर संतांनी लिहिलेले अभंगाच्या रूपातले अक्षरसाहित्य सर्वांच्या जीवनाला मार्गदर्शक आहे. संत नामदेवांनी  नाचू किर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगीतून भाषेचा वापर जनप्रबोधनासाठी केला. ती शिदोरी आपले संचित आहे. शाहिरी कवितेने भाषेचा नाद आणि सौदर्य बहाल केले. कवी केशवसूत, मर्ढेकर, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ यांनी आपल्या कवितांतून काळावर भाष्य केले. भाषिक संक्रमण, घुसळण होऊन नवी भाषा नवा विचार देणारी ठरली. लोकसाहित्यातून आलेली भाषा आणि आजची भाषा यांचा संयोग होऊन एक समृद्ध मराठी भाषा समोर आली आहे. आजच्या पिढीने, तरूणांनी सकस साहित्याचे वाचन करावे. यांच्या भाषेचा अभिमान ठेवावा व मराठी भाषा जगवण्यासाठी व जागवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहनही केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करतांना बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर म्हणाले की, भाषा हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे. मराठी ही बोलीभाषेतून समृद्ध झालेली भाषा आहे. लहानपणापासून प्रत्येक मूल अभिव्यक्तीसाठी शब्दांशी जवळीक साधते आणि त्यातून त्याचा व्यक्तिमत्त्व विकास होतो. आजच्या काळात हरवलेली स्वत:ची भाषा जोपासण्याची गरज आहे. त्यासाठी अशा उपक्रमांची मदतच होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. सुधीर संकलेचा यांनी केले.
स्वानंद बेदरकर यांचा परिचय विश्वास को-ऑप. बँकच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सारिका देशपांडे यांनी करून दिला व सन्मान विश्वास ठाकूर यांनी केला. कवी नरेश महाजन यांचा सन्मान बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद पाटील यांनी तर किरण निकम यांचा सन्मान महाप्रबंधक रमेश बागुल यांनी केला. प्रशांत वाखारे यांचा सन्मान सारिका देशपांडे यांनी केला. वेदांशू पाटील यांचा सत्कार व्यवस्थापक कैलास आव्हाड यांनी केला. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने साहित्य रसिक उपस्थित होते.



Tuesday, 7 January 2020

महिला गौरव पुरस्कार - २०२० साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन....


मा. यशवंतरावजी चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून मानले जातात. राजकीय, सामाजिक, अर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या लक्षणीय कामगिरीमुळे राष्ट्रीय जीवनात महाराष्ट्राला गौरवास्पद स्थान प्राप्त झाले आहे. प्रखर स्वातंत्र्यसेनानी, कुशल मुत्सद्दी, सुसंस्कृत सत्ताधीश, लोकाग्रणी म्हणून त्यांचे स्थान लोकमानसात चिरंतन राहणार आहे. त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा जतन करून सार्वजनिक हिताचे विविध उपक्रम हाती घेण्याच्या उद्देशाने १९८५ साली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ची स्थापना झाली. प्रतिष्ठानतर्फे सन २०१९ पासून 'महिला गौरव पुरस्कार' देण्यात येत आहे. सन २०२० या वर्षासाठी साहित्य क्षेत्रातील कोणत्याही भाषेतील साहित्यकृतींचा उत्तम अनुवाद मराठी भाषेत करणा-या महाराष्ट्रातील महिलेस हा पुरस्कार दिला जाणार असून रोख रक्कम १०,०००/-, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सदर पुरस्कारासाठी महिलांची नावे विहित पध्दतीनूसार सुचविण्यासाठी पुरस्कार नियमावली कृपया यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट मुंबई ४०० ०२१ या पत्तावर संपर्क साधावा. पुरस्कारासाठी नावे पाठविण्याची अखेरची तारिख २६ जानेवारी २०२० आहे.



सृजन विभागातर्फे योगा कार्यशाळा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, सृजन विभागातर्फे योगा कार्यशाळा घेण्यात आली. श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादरचे श्री उदय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पार पडली. कार्यशाळेला ६५ विद्यार्थी उपस्थित होते.





Wednesday, 1 January 2020

फ्यूजन-२०१९ संगम सप्तकलांचा...


सप्तकलांच्या अविष्कारातून रसिकांना नववर्षाची सुरेल भेट

नाशिक (दि. ३१) : सरत्या वर्षाची सायंकाळ आणि सूरांची बरसात  यांचा अनोखा मेळ जीवन जगण्याचे  बळ व सकारात्मक जाणिवांचे आनंदी चांदणे बरसून गेले. प्रत्येक रसिकाने मनात सूरांची आठवण काळीजकुपीत आणि हृदयात निश्चित जपून ठेवली असेल. निमित्त होते नववर्षाच्या पूर्वसंध्येला नव्या संकल्पांची नवी मैत्री, नवी ओळख आनंदाची जाणीव असलेल्या नवीन वर्षाची सुरुवात ही थोड्याशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने व्हावी,  याकरीताच नववर्षाच्या पूर्वसंध्येला काही चांगले संकल्प घेऊन नवीन वर्ष आपण सर्वच एका वेगळ्या प्रकारे साजरा करावा या संकल्पनेतून विश्वास ग्रृप, विश्वास संकल्प आनंदाचा उपक्रमातंर्गत फ्यूजन-२०१९ संगम सप्तकलांचा...या अनोख्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.
सांज सुरांची आठवण, सांज ये गोकुळी या गीतातून अलगद चालत आली आणि त्यानंतर सूर संगीत, ताल यांची अनोखी अनुभूती रसिकांना अमृतानुभव देऊन गेली. नृत्य, लावणी, भावगीत, समुहगीत, त्याचबरोबर शिल्पकला, चित्रकला यांचा अनोखा मिलाप जीवनाचे फ्यूजन कसे सुंदर आकाराला येते याचे दर्शन घडविणारे होते. लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, अधिर मन झाले, चांदणं-चांदणं झाली रात..., वेडात मराठे वीर दौडले सात..., पाहिले नं मी तुला.. तु मला.., वार्‍यावरती गंध पसरला नाते मनाचे..., आम्ही ठाकरं ठाकरं..., लिंबोगाचा डोंगर..., श्रावणाचं ऊन मला झेपेना.., उगवली शुक्राची चांदणी... अशा एकाहून एक सरस गीतांतून मैफिलीला रंग चढत गेला. हिंदी, मराठी गीतांमधला आशय आणि त्यातून मिळणारा संगितानुभव भारतीय चित्रपट संगीताचा सुरमयी प्रवासच होता. याद किया दिल ने कहाँ हो तुम..., आजी रूठ के अब कहाँ जायीगा..., अभी ना जाओ छोडकर अशा गीतांमधली नजाकत जीवनावरचं प्रेम आणि आशयाचं दर्शन घडविणारे होते. सचिन शिंदे दिग्दर्शित विनोदी नाट्यप्रवेशाने रसिकांना नाट्यानुभवाची अनोखी हास्यानुभूती दिली. जीवनातल्या रोजच्या विसंगतीवर त्यातून नेमके बोट ठेवले.
विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकरनगर, गंगापूर रोड येथे सदर मैफल संपन्न झाली. कार्यक्रमाची संकल्पना विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख विश्वास जयदेव ठाकूर यांची होती तर संयोजक मिलिंद धटिंगण हे होते. सदर उपक्रमाचे ५ वे वर्ष असून नववर्षाच्या पूर्वसंध्येला वेगळे आणि अभिरूची संपन्न कार्यक्रमाची परंपरा विश्वास गृ्रपने राखली आहे.
शब्द-सूर-ताल-रंगरेषा या समन्वयातून वैशिष्ठपूर्ण अविष्कार रसिकांना अनुभवण्यास मिळाला. चित्र, शिल्प, गायन, नृत्य अशी ही विविधरंगी मैफल आनंदानुभव देणारी ठरली.
विश्वास को-ऑप बँक लि. नाशिक,  सारस्वत बँक,  फॅरवशी इंटरनॅशनल अ‍ॅकेडमी, जुम्मा मस्जिद चॅरिटेबल ट्रस्ट,  स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था, पिंपळगाव (ब.), नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, नाशिक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमास नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे-पाटील यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की,
समाजाला आनंद देण्यासाठी विश्वास संकल्प आनंदाचा ही जनमानसांची चळवळ झाली असून समाजाला विधायक कार्याची प्रेरणा देणारी आहे. यातून नव्या पिढीलाही दिशा मिळेल.

एकदिवशीय चित्रपट रसग्रहण शिबिर...


१० वा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १७ जानेवारी ते २३ जानेवारी २०२० या कालावधीमध्ये होत असून त्यानिमित्ताने शनिवार, ४ जानेवारी २०२० दुपारी २ ते ७ यावेळेत, रंगस्वर सभागृह, चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट, येथे 'एकदिवशीय चित्रपट रसग्रहण शिबिर' होणार असून यासाठी प्रसिद्ध नाट्य/चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व प्रसिद्ध व लोकप्रिय चित्रपट शिक्षण तज्ञ श्री. समर नखाते मार्गदर्शन करणार आहेत. मोफत रजिस्ट्रेशनसाठी अतूल यांच्याशी ०२२-२२०२८५९८ वर संपर्क साधावा.