Sunday, 26 May 2019

विज्ञानाच्या वाटचालीला नवे वळण दिले...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत अडतीसावे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डॉ. राजीव चिटणीस यांनी 'आइन्स्टाइनचा सापेक्षातावाद' या विषयावर बोलताना आइन्स्टाइनचा संशोधनाचा कालखंडारूप प्रवास त्यांनी उलघडून दाखवला. तसेच गतीचा वस्तुमानावरचा परिणाम, वस्तुमान-ऊर्जेची समतुलता व गुरुत्वाकर्षण व त्वरण यामधील फरक ह्याविषयी उदाहरणासहित विज्ञानप्रेमीना समजून सांगितले. विज्ञानप्रेमीच्या प्रश्नोत्तर सत्रात त्यांनी मार्गदर्शन केले. 








मानवी नातेसंबंध, अपुरेपण यांचा अविष्कार ‘चार सख्य चोवीस’ मधून सादर




मानवी नातेसंबंध, जगण्याची उत्कटता, जगण्यातले वैविध्यपण, माणूस म्हणून जगण्याची नेमकी गरज, काळाला पूरून उरणा-या नात्यांची उपयुक्तता, काळाचा वेग आणि कौटुंबिक अस्वस्थता यांचा अनोखा वेध चार सख्य चोवीसकथांच्या अभिवाचनातून रसिक घेत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यामाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  
संपदा जोगळेकर- कुलकर्णी यांच्या
ध्यानस्थकथेने अभिवाचनाची सुरुवात झाली. त्यानंतर सोनाली लोहार यांनी कालाय तस्मै नम:या कथेतून जगण्यातील गुंतवळ, अपुरेपण, आतली धुसपूस प्रभावीपणे मांडली. कथेतून आजूबाजूच चित्र जसेच्या तसे उभे राहत होते. संवादातील तरलता, भाषेचा स्वाभाविक वापर कथांची परिणामकारकता वाढवत होता.
सुप्रसिद्ध अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी, हर्षदा बोरकर, निर्मोही फडके, सोनाली लोहार या चौघी जणींनी हा कथा अविष्कार सादर केला. विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या कार्यक्रमाचे आयोजक व संयोजक विनायक रानडे होते.
चार समविचारी, सहसंवेदना असणा-या मैत्रिणींनी कथामधून आजचं जगण्याचं नेमकं विश्व उभे केले. स्त्री लेखिकांनी अभिव्यक्तीचा नवा अविष्कार भाषेचे वेगळेपण घेऊन समोर आला.
हेमंत टकले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की,
स्त्रियांनी केलेले लेखन हे नवी उर्मी आणि गरज घेऊन निर्माण होत आहे. त्यातून समाजाचं नेमकं प्रतिबिंब पडत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. हरी विनायक कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजश्री शिंपी यांनी केले. संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांचा सन्मान आ. हेमंत टकले यांनी, हर्षदा बोरकर यांचा सन्मान सारिका देशपांडे, निर्मोही फडके यांचा सन्मान विनायक रानडे, सोनाली लोहार यांचा सन्मान डॉ. मनोज शिंपी यांनी केला. आभार प्रदर्शन विनायक रानडे यांनी केले.






Thursday, 16 May 2019

क्रिस्तोफर नोलन यांच्या ‘डंकिर्क’ चित्रपटाचे प्रदर्शन...




यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व एमजीएम पत्रकारीता महाविद्यालय संचालीत एमजीएम फिल्म आर्ट्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रपट चावडी उपक्रमाअंतर्गत शनिवार, दि. १८ मे २०१९ रोजी सायं. ६ वा. क्रिस्तोफर नोलन यांचा डंकिर्कहा चित्रपट चित्रपती व्ही. शांताराम प्रेक्षागृह, एमजीएम फिल्म आर्ट विभाग, एमजीएम पत्रकारीता महाविद्यालय, औरंगाबाद येथे दाखविण्यात येणार आहे.
ब्रिटिश-अमेरिकन-फे्रंच-डच यांची सहनिर्मिती असलेला डंकिर्कहा चित्रपट असून यामध्ये जॅक लोडेन, हॅरी स्टिल्स, एन्युरीन बर्नार्ड, जेम्स डी आर्सी, बॅरी किओहान, केनेथ ब्रानाघ, सिल्लियन मर्फी, मार्क रिलान्स आणि टॉम हार्डी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटासाठी क्रिस्तोफर नोलन यांना दिग्दर्शन करण्यासाठी प्रथम ऑस्कर नामांकन मिळाले आहे. दुसर्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आयमॅक्स फॉरमॅटमध्ये चित्रीत झालेला डंकिर्कहा चित्रपट बघण्यासाठी त्याच दर्जाचे थिएटर असणे गरजेचे असते. एमजीएमच्या फिल्म आर्टच्या चित्रपती व्ही शांताराम थिएटरमध्ये या सर्व सुविधा आहेत. त्यामुळे दुसर्या महायुद्धात डंकर्क या ठिकाणी घडलेला थरार प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
चित्रपट सर्वांसाठी खुला असून चित्रपट रसिकांनी या चित्रपटाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत,  कार्यकारिणी सदस्य डॉ. भालचंद्र कांगो, विजय कान्हेकर आदींनी केले आहे.




Wednesday, 15 May 2019

स्वाक्षरी विश्लेषण कार्यशाळा संपन्न...

संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे स्वाक्षरी विश्लेषण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. स्वाक्षरीमुळे आपल्या आयुष्यात खूप फरक पडत असतो. स्वाक्षरी करण्याच्या पद्धतीवर आपल यश-अपयश अवलंबून असत. स्वाक्षरीवरून माणसाची विचार करण्याची पद्धत, माणसाचा स्वभाव ओळखता येतो, असे प्रशिक्षक प्रकाश मोहिते म्हणाले.
या कार्यशाळेत स्वाक्षरी कशी असावी, प्रगतीतील अडथळे दूर करण्याचे उपाय, आर्थिक प्रगतीचे व यशाचे उपाय, राग नियंत्रित कसा करणे, आत्मविश्वास वाढविणे, स्मरणशक्ती व एकाग्रता वाढविणे, ताण तणाव कमी करण्याचे उपाय अशा विविध विषयांवर प्रकाश मोहिते यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यशाळा पूर्ण करणा-यांना प्रमाणपत्र देण्यात आले.



















Sunday, 12 May 2019

विज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत अडतीसावे पुष्प ‘आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद’...



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत अडतीसावे व्याख्यान ‘आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद या विषयावर डॉ. राजीव चिटणीस शुक्रवार दि. १७ मे रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट मुंबई येथे गुंफणार आहे. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.




युवा छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन...



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद व कलर्स ऑफ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद शहरातील ६० युवा छायाचित्रकारांच्या समावेश असलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन रविवार १२ मे रोजी सकाळी मनपा आयुक्त डॉ.निपुण विनायक यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शहराचे महापौर नंदकुमार घोडेले उपस्थित होते.
पुढील तीन रविवार शहरातील विविध ठिकाणी हे प्रदर्शन संपन्न होणार आहे. याप्रसंगी विभागीय केंद्राचे सचिव नीलेश राऊत, विजय कान्हेकर, अॅड. स्वप्नील जोशी, प्रदर्शनाचे संयोजक ज्ञानेश्वर पाटील, आदित्य दिवाण, किशोर निकम, सुबोध जाधव, निखिल भालेराव आदी उपस्थित होते.






शाहिर अनंत फंदी यांच्या शहिरीतून समाज वास्तवाचे परखड़ प्रतिबिम्ब -प्रा शिरीष गंधे



महाराष्ट्रातील शाहिरांनी धीटपणाने सामाजिक वास्तव मांडले, विलक्षण भाषावैभव संवेदनशीलता यांचा अनोखा संगम त्यांच्या शाहिरीत दिसून येतो. अनंत फंदी यांची शाहिरी काळाचे नेमके चित्रण करणारी होती म्हणूनच ते द्र्ष्टे कलावंत होते.
त्यातूनच समाजाबरोबरच सामान्य माणसाचे दुःख, त्यांची हतबलता त्यांच्या काव्यात सहजपणे येते.
दागिन्यांची वर्णन करणारी 'चंद्रावळ' सारखी लावणी असो किंवा दुसऱ्या बाजीरावाला उद्देशून 'दोन दिसाची जाईल सत्ता, अपयश माथा घेऊ नको' त्यांच्यातील रोखठोक शाहिरीचे दर्शन घडवते असे प्रतिपादन प्रा. शिरीष गंधे यानी केले. प्रख्यात शाहीर अनंत फंदी यांच्या द्विशताब्दी स्मृतीवर्षानिमित्त अनंत फंदी-चरित्र व कार्य या विषयांवर सुप्रसिद्ध लेखक प्रा. शिरीष गंधे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, ग्रंथ तुमच्या दारी सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला. विश्वास ग्रुप चे कुटुंबप्रमुख, विश्वास ठाकुर कार्यक्रमाचे आयोजक होते. अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, येथे हा कार्यक्रम संपन्न झाला
शाहिरी लोककला ही समाजाचा आरसा आहे व त्यांचे जतन तसेच संवर्धन करणे म्हणजे अनंत फंदी यांचे खरे स्मरण होईलअसे ते म्हणाले. कार्यक्रमाचे स्वागत व् प्रास्ताविक प्रसाद विजय पाटील यानी केले. प्रा. गंधे यांचा सन्मान विनायक रानडे यांनी केला. अनिता गंधे यांचा सन्मान अनिता नेवे यानी केला.