Tuesday, 31 July 2018

स्व-संरक्षण प्रशिक्षण वर्ग

आजच्या काळात आत्मरक्षण अथवा स्व-संरक्षण ही बाब महिला, पुरूष, मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे. आज महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यावर होणारे हल्ले ही चिंताजनक बाब लक्षात घेऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या नवमहाराष्ट्र अभियानातर्फे स्व-संरक्षण प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण वर्गाचा कार्यक्रम शनिवारी १८ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी २ ते ५ यावेळेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई येथे होईल.  प्रवेश विनामुल्य असून संपर्क अरविंद खैरे यांच्याशी साधावा - ९८१९५०१५३२

१८ ऑगस्टला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात बैठक

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृतीसाठी काय करता येणे शक्य आहे तसेच उत्तम कार्यक्रम कसे करता होतील आणि विचारांची, साहित्याची देवघेव होऊन एकूणच मराठी भाषा/वाड्:मयाचा विकास कसा साधता येईल या विषयावरती बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय ही राज्यातील एक नामांकित संस्था आहे. मराठी वाड्:मय, भाषा आणि संस्कृती या क्षेत्रात संस्थेचे मोठे कार्य आहे. मुंबईत संस्थेच्या असलेल्या ४४ शाखांच्या माध्यमातूंन अनेक उपक्रम सुरू आहेत. १८ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी ४ वाजता मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे शारदा मंगल कार्यालय, दादर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी महाविद्यालयातील मराठी वाड्:मय मंडळाच्या प्राध्यापक तसेच विद्यार्थी प्रतिनिधींना बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजीत संस्थांकडून करण्यात आले आहे.

Tuesday, 24 July 2018

भावपूर्ण आदरांजली

 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र, लातूरचे सचिव, ज्येष्ठ समाजसेवक, एक नाट्य् कलावंत, समाजहृदयी शिक्षक, मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व श्री.हरिभाऊ जवळगे यांचे आज पहाटे २:३० वाजता प्रदिर्घ आजाराने दु:खद निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाने ते पिडीत होते. ते ७४ वर्षाचे होते. त्यांचा अंत्यविधी आज दि.२४:०७:२०१८ रोजी दुपारी ठिक २:०० वाजता 'मंगरुळ' ता. औसा जि. लातूर याठिकाणी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले डॉ.रवि व राहुल ,स्नुषा व नातवंडे आहेत. (टिप- मंगरुळ हे गाव किल्लारी पासुन पश्चिमेकडे ८ कि.मी.अंतरावर आहे.) ‌‌ शोकाकुल विवेक सौताडेकर, कोषाध्यक्ष- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, लातूर.

Sunday, 22 July 2018

अजित दादांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त साहित्य वाटप

मा. अजित दादांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या अपंग हक्क विकास मंच तर्फे बदलापूर मधील दिव्यांग लोकांना विविध साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी अपंग हक्क विकास मंचचे विजय कान्हेकर, प्रविण शिंदे, सुरज चव्हाण आणि कॅप्टन आशिष दामले उपस्थित होते

कुमार गंधर्व समजून घेण्याचा अवीट प्रवास

औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद व स.भु.कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कुमार गंधर्व यांच्या बंदिशीवर,गायकीवर,सांगितिक प्रवासावर आधारित "बहुरी अकेला" हा दृक-श्राव्य कार्यक्रमाने रसिकासमोर कुमार गंधर्व यांचा सांगीतिक जीवनपट उभा केला.

सायली ताम्हणे आणि धनंजय मुळी यांनी उत्तम सादरीकरण करून कार्यक्रम एका उंचीवर नेला.कुमार गंधर्व यांचे गायना विषयीचे विचार,त्यांनी गायलेल्या तुकाराम,कबीर,तुलसीदास,सूरदास यांच्या भजनापासून तर लोकधुन मधून केलेली रागाची निर्मिती पर्यंतचा प्रवास ऐकताना रसिक अक्षरसः मंत्रमुग्ध झाले.
कुमार गंधर्वांवर सादर केलेल्या ‘बहुरी अकेला’ हा कार्यक्रम हा लौकिकार्थाने गाण्याचा कार्यक्रम नाही म्हणजे ‘कुमारांची’ गाणी सादर करणे असा तो कार्यक्रम नव्हता तर कुमारांनी गायकी क्षेत्रात डोळसपणे केलेले वेगवेगळे प्रयोग, धुंढाळलेल्या नवीन नवीन वाटा, त्यांनी फक्त लोकप्रिय गाणी वारंवार सादर करणे टाळून सातत्याने प्रयोगशीलता जपली, मग त्यातून कबिरांचे निर्गुणी भजन किंवा बालगंधर्वांची गायकी असेल किंवा मिराबाईची भजने, तुकारामांच्या रचना, माळव्यात गायली जाणारी लोकगीत यासोबत अनेक प्रयोगातून वेगळेपणा जपला, पडलेल्या प्रश्नाची उत्तरे डोळसपणे शोधली वसंत बापटांनि घेतलेली मुलाखत या कार्यक्रमात आहे, त्यात संगीत ईश्वराची अनुभूती देते का या प्रश्नावर कुमारांनि खूप सुंदर उत्तर दिलंय, " मी गाण्याची अनुभूती घेतो, बाकी देव असेल तर तो नक्की येईलच की " कुमार गंधर्व लौकिकार्थाने बंडखोर होते असे म्हणता येणार नाही पण अतिशय डोळसपणे प्रयोगशील गायक होते, व्यवसायाने अभियंता असलेले सायली तामने, सनत गानू आणि धनंजय मुळी यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली होती.
गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रतिष्ठानच्या औरंगाबाद केंद्राचे सचिव नीलेश राऊत यांनी केले.यावेळी सभु संस्थेचे सहसचिव श्रीरंग देशपांडे,साहित्यिक रा.रं.बोराडे,प्राचार्य डॉ. जगदिश खैरनार,संगीत विभाग प्रमुख डॉ. संजय मोहोड यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गिरीश व कस्तूरी जोशी तर आभार श्रीकांत देशपांडे यांनी मानले.

Friday, 20 July 2018

विज्ञानगंगाचे अठ्ठाविसावे पुष्प संपन्न

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत अठ्ठाविसावे पुष्प प्रा. अशोक रूपनेर यांचे 'घरगुती टिकाऊ वस्तूतून विज्ञान खेळणी' या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

आजच्या कार्यक्रमासाठी खासकरून टिळकनगर येथील माझी शाळाचे विध्यार्थी उपस्थित होते. रुपनेर यांनी सुरवातीला पांढरा फुगा लेजर लाइटने का फुटत नाही आणि इतर कलरचे फुगे कसे फुटतात याबाबत मार्गदर्शन केले, त्यानंतर त्यांनी फुग्यांमध्ये इंजेक्शन मारल्यानंतर फुगा का फुटत नाही हा प्रयोग करून दाखवला आणि विध्यार्थीना खुश झाले. 
त्यानंतर रुपनेर यांनी विज्ञानाच्या दृष्टीने टाकाऊ पासून टिकाऊ कशाप्रकारे बनवू शकतो यांचे उत्तम प्रयोग विद्यार्थ्यांना दाखवले. तसेच विध्यार्थ्यांना घरी प्रयोग करण्यासाठी प्रयोग वस्तू भेट देऊन कार्यक्रम संपन्न केला.

Wednesday, 18 July 2018

कुमार गंधर्वांच्या संगीतावर आधारीत दृक-श्राव्य कार्यक्रम 'बहुरी अकेला'

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, औरंगाबाद स. भु. कला आणि वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने कुमार गंधर्वांच्या संगीतावर आधारीत दृक-श्राव्य कार्यक्रम बहुरी अकेला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवारी २१ जुलै २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी सभागृह, स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालय औरंगाबाद येथे होईल. या कार्यक्रमाचे सादरीकरण सायली ताम्हने, सनत गानू आणि धनंजय मुळी हे कलावंत करतील.