Sunday 19 August 2018

देशासाठी लढणार्‍यांचे स्मरण करून प्रत्येकाने देशहिताचा विचार करावा- विश्वास ठाकूर


नाशिक  : देशासाठी लढणार्‍या हुतात्म्यांचे स्मरण करून देश विकासासाठी व देशरक्षणासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे असून लोकशाही मूल्यांची जपणूक करून समानता जोपासावी. असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र नाशिकचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ७२ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ‘युवा स्वतंत्रता ज्योत रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ७ वाजता हुतात्मा चौक, गंगापूर रोड येथून रॅलीला प्रारंभ झाला. गंगापूरनाका,  के.टी.एच.एम. महाविद्यालय, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, हुतात्मा स्मारक सीबीएस येथे रॅलीचा समारोप झाला. त्यावेळी अर्चना भागवत यांनी राज्यघटनेच्या सरनाम्याचे सामुहिक वाचन केले. भारतमातेच्या वेशातील मुलगी सजविलेल्या रथात विराजमान झालेली होती.
यावेळी उपस्थित युवकांनी देशभक्तीपर गीतांनी व घोषणांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले. रॅलीत अनेक सामाजिक संस्था उत्स्फुर्तपणे सहभागी झाल्या होत्या. रॅलीच्या सुरूवातीला  शिक्षण व आरोग्यविषयक प्रबोधनपर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. रॅलीमध्ये प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य अ‍ॅड. नितिन ठाकरे तसेच अमर भागवत, चंद्रशेखर ओढेकर, किरण निकम, प्रसाद पाटील, गोरख चव्हाण, विवेकराज ठाकूर, मंदार ठाकूर, कैलास सुर्यवंशी, किशोर त्रिभुवन, रमेश बागुल, सुरेश वाघ, पूनम काशिकर, प्रियंका ठाकूर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment