Tuesday 31 July 2018

स्व-संरक्षण प्रशिक्षण वर्ग

आजच्या काळात आत्मरक्षण अथवा स्व-संरक्षण ही बाब महिला, पुरूष, मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे. आज महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यावर होणारे हल्ले ही चिंताजनक बाब लक्षात घेऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या नवमहाराष्ट्र अभियानातर्फे स्व-संरक्षण प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण वर्गाचा कार्यक्रम शनिवारी १८ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी २ ते ५ यावेळेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई येथे होईल.  प्रवेश विनामुल्य असून संपर्क अरविंद खैरे यांच्याशी साधावा - ९८१९५०१५३२

१८ ऑगस्टला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात बैठक

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृतीसाठी काय करता येणे शक्य आहे तसेच उत्तम कार्यक्रम कसे करता होतील आणि विचारांची, साहित्याची देवघेव होऊन एकूणच मराठी भाषा/वाड्:मयाचा विकास कसा साधता येईल या विषयावरती बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय ही राज्यातील एक नामांकित संस्था आहे. मराठी वाड्:मय, भाषा आणि संस्कृती या क्षेत्रात संस्थेचे मोठे कार्य आहे. मुंबईत संस्थेच्या असलेल्या ४४ शाखांच्या माध्यमातूंन अनेक उपक्रम सुरू आहेत. १८ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी ४ वाजता मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे शारदा मंगल कार्यालय, दादर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी महाविद्यालयातील मराठी वाड्:मय मंडळाच्या प्राध्यापक तसेच विद्यार्थी प्रतिनिधींना बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजीत संस्थांकडून करण्यात आले आहे.

Tuesday 24 July 2018

भावपूर्ण आदरांजली

 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र, लातूरचे सचिव, ज्येष्ठ समाजसेवक, एक नाट्य् कलावंत, समाजहृदयी शिक्षक, मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व श्री.हरिभाऊ जवळगे यांचे आज पहाटे २:३० वाजता प्रदिर्घ आजाराने दु:खद निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाने ते पिडीत होते. ते ७४ वर्षाचे होते. त्यांचा अंत्यविधी आज दि.२४:०७:२०१८ रोजी दुपारी ठिक २:०० वाजता 'मंगरुळ' ता. औसा जि. लातूर याठिकाणी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले डॉ.रवि व राहुल ,स्नुषा व नातवंडे आहेत. (टिप- मंगरुळ हे गाव किल्लारी पासुन पश्चिमेकडे ८ कि.मी.अंतरावर आहे.) ‌‌ शोकाकुल विवेक सौताडेकर, कोषाध्यक्ष- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, लातूर.

Sunday 22 July 2018

अजित दादांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त साहित्य वाटप

मा. अजित दादांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या अपंग हक्क विकास मंच तर्फे बदलापूर मधील दिव्यांग लोकांना विविध साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी अपंग हक्क विकास मंचचे विजय कान्हेकर, प्रविण शिंदे, सुरज चव्हाण आणि कॅप्टन आशिष दामले उपस्थित होते

कुमार गंधर्व समजून घेण्याचा अवीट प्रवास

औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद व स.भु.कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कुमार गंधर्व यांच्या बंदिशीवर,गायकीवर,सांगितिक प्रवासावर आधारित "बहुरी अकेला" हा दृक-श्राव्य कार्यक्रमाने रसिकासमोर कुमार गंधर्व यांचा सांगीतिक जीवनपट उभा केला.

सायली ताम्हणे आणि धनंजय मुळी यांनी उत्तम सादरीकरण करून कार्यक्रम एका उंचीवर नेला.कुमार गंधर्व यांचे गायना विषयीचे विचार,त्यांनी गायलेल्या तुकाराम,कबीर,तुलसीदास,सूरदास यांच्या भजनापासून तर लोकधुन मधून केलेली रागाची निर्मिती पर्यंतचा प्रवास ऐकताना रसिक अक्षरसः मंत्रमुग्ध झाले.
कुमार गंधर्वांवर सादर केलेल्या ‘बहुरी अकेला’ हा कार्यक्रम हा लौकिकार्थाने गाण्याचा कार्यक्रम नाही म्हणजे ‘कुमारांची’ गाणी सादर करणे असा तो कार्यक्रम नव्हता तर कुमारांनी गायकी क्षेत्रात डोळसपणे केलेले वेगवेगळे प्रयोग, धुंढाळलेल्या नवीन नवीन वाटा, त्यांनी फक्त लोकप्रिय गाणी वारंवार सादर करणे टाळून सातत्याने प्रयोगशीलता जपली, मग त्यातून कबिरांचे निर्गुणी भजन किंवा बालगंधर्वांची गायकी असेल किंवा मिराबाईची भजने, तुकारामांच्या रचना, माळव्यात गायली जाणारी लोकगीत यासोबत अनेक प्रयोगातून वेगळेपणा जपला, पडलेल्या प्रश्नाची उत्तरे डोळसपणे शोधली वसंत बापटांनि घेतलेली मुलाखत या कार्यक्रमात आहे, त्यात संगीत ईश्वराची अनुभूती देते का या प्रश्नावर कुमारांनि खूप सुंदर उत्तर दिलंय, " मी गाण्याची अनुभूती घेतो, बाकी देव असेल तर तो नक्की येईलच की " कुमार गंधर्व लौकिकार्थाने बंडखोर होते असे म्हणता येणार नाही पण अतिशय डोळसपणे प्रयोगशील गायक होते, व्यवसायाने अभियंता असलेले सायली तामने, सनत गानू आणि धनंजय मुळी यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली होती.
गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रतिष्ठानच्या औरंगाबाद केंद्राचे सचिव नीलेश राऊत यांनी केले.यावेळी सभु संस्थेचे सहसचिव श्रीरंग देशपांडे,साहित्यिक रा.रं.बोराडे,प्राचार्य डॉ. जगदिश खैरनार,संगीत विभाग प्रमुख डॉ. संजय मोहोड यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गिरीश व कस्तूरी जोशी तर आभार श्रीकांत देशपांडे यांनी मानले.

Friday 20 July 2018

विज्ञानगंगाचे अठ्ठाविसावे पुष्प संपन्न

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत अठ्ठाविसावे पुष्प प्रा. अशोक रूपनेर यांचे 'घरगुती टिकाऊ वस्तूतून विज्ञान खेळणी' या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

आजच्या कार्यक्रमासाठी खासकरून टिळकनगर येथील माझी शाळाचे विध्यार्थी उपस्थित होते. रुपनेर यांनी सुरवातीला पांढरा फुगा लेजर लाइटने का फुटत नाही आणि इतर कलरचे फुगे कसे फुटतात याबाबत मार्गदर्शन केले, त्यानंतर त्यांनी फुग्यांमध्ये इंजेक्शन मारल्यानंतर फुगा का फुटत नाही हा प्रयोग करून दाखवला आणि विध्यार्थीना खुश झाले. 
त्यानंतर रुपनेर यांनी विज्ञानाच्या दृष्टीने टाकाऊ पासून टिकाऊ कशाप्रकारे बनवू शकतो यांचे उत्तम प्रयोग विद्यार्थ्यांना दाखवले. तसेच विध्यार्थ्यांना घरी प्रयोग करण्यासाठी प्रयोग वस्तू भेट देऊन कार्यक्रम संपन्न केला.

Wednesday 18 July 2018

कुमार गंधर्वांच्या संगीतावर आधारीत दृक-श्राव्य कार्यक्रम 'बहुरी अकेला'

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, औरंगाबाद स. भु. कला आणि वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने कुमार गंधर्वांच्या संगीतावर आधारीत दृक-श्राव्य कार्यक्रम बहुरी अकेला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवारी २१ जुलै २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी सभागृह, स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालय औरंगाबाद येथे होईल. या कार्यक्रमाचे सादरीकरण सायली ताम्हने, सनत गानू आणि धनंजय मुळी हे कलावंत करतील. 

Thursday 12 July 2018

विशेष निवेदन

शिक्षण विकास मंच-यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि ज्ञानभाषामराठी प्रतिष्ठान, डोंबिवली या दोन संस्थांच्या वतीने "सेमी-ENGLISH" या विषयावर एक मार्गदर्शक ग्रंथ तयार करण्याचे प्रयोजन आहे.

शिक्षण विकास मंचने २५ नोव्हेंबर २०१७ रोजी 'सेमी इंग्रजी-काल,आज,उद्या' या विषयावर राज्यस्तरीय परिषद आयोजित केली होती. या परिषदेत संबंधित विषयावर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेचा संदर्भ घेऊन सर्वाना मार्गदर्शक ठरणारा ग्रंथ तयार करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे.

सदर काम वर उल्लेखलेल्या दोन्ही संस्थांच्या सहकार्याने केले जात आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्य माहिती असेलच.. *संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार , पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मृत्यूनंतर त्याचे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी १९८५ साली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना झाली.* प्रतिष्ठान समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत आहे. प्रतिष्ठानचे शिक्षणविषयक कार्यक्रम "शिक्षण विकास मंच" च्या माध्यमातून आयोजित करण्यात येतात. याच्या निमंत्रक मा. खासदार सुप्रियाताई सुळे आहेत तर मुख्य संयोजक जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ डाॅ.वसंतराव काळपांडे हे आहेत. २००८ पासून शिक्षण विकास मंच महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे याकरीता प्रयत्नरत आहे. यासाठी शिक्षण विकास मंच राज्यभर विविध उपक्रम राबवित असतो. विविध विषयावर शैक्षणिक परिषदा ,कार्यशाळा, चर्चासत्रे, शिक्षक साहित्य संमेलने, शिक्षणकट्टा, उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथाना पुरस्कार आणि विविध मार्गदर्शनपर पुस्तकाची निर्मिती इत्यादी.

त्याचप्रमाणे "ज्ञानभाषामराठी प्रतिष्ठान" ही मराठी भाषेप्रती बांधिलकी बाळगणारी संस्था आहे. २०१७ साली नोंदणीकृत झालेल्या संस्थेचे अध्यक्ष सुचिकांत वनारसे आहेत . अल्पावधीतच या संस्थेने मराठी भाषेच्या संदर्भात संवर्धनाच्या, प्रसाराच्या कार्यासाठी जी पावले टाकली आहेत, ती कौतुकास्पद आहेत. संस्थेच्या कार्यकारी मंडळामार्फत गेल्या तीन वर्षांत अनेक भाषिक तसेच शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. "ज्ञानभाषामराठी प्रतिष्ठान"ने स्वतःला मातृभाषेतून शिक्षणाचे समर्थन, प्रचार-प्रसार आणि सक्षमीकरण यासाठी वाहून घेतले आहे. मराठी ही ज्ञानभाषा म्हणून सक्षम व्हावी, लोकभाषा आणि राजभाषा म्हणून सार्वजनिक क्षेत्रात तिला प्राधान्य मिळावे ही भूमिका "ज्ञानभाषामराठी प्रतिष्ठान"ने नेहमीच घेतली आहे. विविध समाजमाध्यमाच्या मदतीने प्रतिष्ठानने महाराष्ट्रभर झेप घेतली आहे. त्या त्या भागातील सदस्यांना सोबत घेऊन मराठी भाषा सक्षमीकरणाचे काम सुरू केले आहे. माझी शाळा-माझी भाषा, ऑनलाईन वाचनकट्टा, युनिकोडिंग,चला अनुवाद करू या, ज्ञान-विज्ञानपर साहित्याचा प्रसार, निर्मिती आदी उपक्रमातून ज्ञानभाषामराठी प्रतिष्ठानचे काम सुरू आहे.

उपरोक्त उल्लेख केलेल्या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून 'सेमी-ENGLISH' या विषयावर काम सुरू आहे.
सेमी इंग्रजी वर्ग भरवणाऱ्या शाळांच्या सक्षमीकरणाचा भाग म्हणून सर्वाना मार्गदर्शक ठरणारा, विविध शालेय उपक्रमाचा अंतर्भाव असणारा संशोधन ग्रंथ आम्ही तयार करीत आहोत.

याकामी आपण आपल्या शाळेत राबविलेले उपक्रम व अन्य माहिती पुढे दिलेल्या गुगल फॉर्मच्या प्रश्नावलीत भरून दयावी असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने डाॅ.वसंतराव काळपांडे यांनी केले आहे.

गुगल फॉर्म- https://goo.gl/9Pdmss
अधिक माहितीसाठी संपर्क :-
इमेल - semi-english@gmail.com
श्री. अजित तिजोरे- ८०९७६१७०२०
श्री. माधव सूर्यवंशी- ९९६७५४६४९८
सौ. मृणाल पाटोळे- ७५०६९१९८१६

शेतकरी कंपन्यांच्या सक्षमीकरणाकरीता दि. १६ जुलै रोजी सीटा संवाद कार्यक्रमाचे आयोजन


अहमदनगर : सीटा (सेंटर फॉर इंटरनॅशनल ट्रेड इन अ‍ॅग्रीकल्चर अ‍ॅण्ड अॅग्रोबेस्ड इंडस्ट्रिज), यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी कंपन्या वा फार्मर प्रोड्युसर कंपन्या आणि शेतमालाचे ठोक खरेदीदार यांच्यासाठी इ-कॉमर्स प्लॅटफार्मची निर्मिती, शेतकरी कंपन्यांचा सक्षमीकरण या विषयावर सीटा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सोमवारी १६ जुलै २०१८ रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत सदरील कार्यक्रम कृषी महाविद्यालय सोनई येथे होणार आहे. 
या कार्यक्रमामध्ये सीटाचे संचालक ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ, मा. फिरोज मसानी, सीटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमुख पाहुणे मा. सुनील तांबे, आणि मा. दत्ता बाळसराफ इत्यादी मान्यवर मार्गदर्शन करतील. तसेच मा. भाऊसाहेब ब-हाटे प्रकल्प संचालक आत्मा, अहमदनगर यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आहे. 
सदरील कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, पूर्व नोंदणी आवश्यक आहे. दि. १५ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत इच्छुकांनी (मो.क्र. ८३९०६५४१०९, ९५२७११०८०९ )या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र अहमदनगर चे सचिव प्रशांत गडाख यांनी केले आहे.

विज्ञानगंगाचे अठ्ठाविसावे पुष्प...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत अठ्ठाविसावे पुष्प प्रा. अशोक रूपनेर यांचे 'घरगुती टिकाऊ वस्तूतून विज्ञान खेळणी' या विषयावरील व्याख्यान शुक्रवार, दिनांक २० जुलै २०१८ रोजी दुपारी २ ते ४ यावेळेत चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईट, मुंबई ४०००२१ येथे आयोजीत करण्यात आले आहे. तरी वरील कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.

Sunday 8 July 2018

बदलापूरच्या पर्जन्यगंगेत विज्ञानगंगा संपन्न...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कोकण विभाग, ठाणे व मराठी विज्ञान परिषद आणि युवाराज प्रतिष्ठान, बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबईचे प्रा. रा. ना. जगताप यांचे 'प्लास्टिक हे पर्यावरणाला वरदान की शाप' या विषयावरील व्याख्यान शनिवार दिनांक ७ जुलै रोजी सजीवनी हॉल, बदलापूर येथे संपन्न झाले. जगताप यांनी प्लास्टिकसाठी पॉलीमार वापरुन तयार केले जाते. पॉलीमार अनेक वस्तू मध्ये वापरले जाते ते फक्त पिशव्यासाठी वापरे जात नाही. त्यामुळे पॉलिमर शिवाय जगण अशक्य आहे असे त्यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले. व्याख्यानात प्लास्टिक शाप की वरदान याविषयी सखोल माहिती त्यांनी प्रेजेटेशन माध्यमातून दिली. यावेळी वक्ते रा.ना. जगताप यांचा युवाराज प्रतिष्ठानचे प्रशांत गायकवाड यांच्या हस्ते शाल देऊन सत्कार करण्यात आला. युवाराज प्रतिष्ठानचे तेजस यांनी प्रास्ताविक केले व सचिन पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Saturday 7 July 2018

योगसाधनेतून मन चैतन्यमय होते - योगप्रशिक्षक, रेवती नरवाडे

नाशिक : मनाला चैतन्यमय ठेवण्यासाठी व शारीरिक स्वास्थ उत्तम ठेवण्यासाठी ‘योगसाधना’ हा जीवन शैलीचा भाग बनवण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे. आजच्या धावपळीच्या व ताणतणावाच्या आयुष्यात योग जीवनात आनंद निर्माण करतो व मानसिक ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतो. असे प्रतिपादन योग योगप्रशिक्षक, रेवती नरवाडे यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, निसर्गोपचार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त सामुहिक योगाचे आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रम डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, सावरकरनगर येथे संपन्न झाला. सदर उपक्रमाची संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर यांची होती.

रेवती नरवाडे म्हणाल्या की, विचारांना, मेंदूला कायमच सजग ठेवण्यासाठी योग महत्त्वाचा आहे. त्यातून मन प्रफुल्लीत राहते व सकारात्मक विचार निर्माण होण्यास मदत होते. ओमकाराची साधना आणि प्राणायामातून शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते आणि त्यातून मनोबल वाढते. निरामय व निरोगी जीवनाचा योगा हा प्रभावी मंत्र आहे. योगसाधना ही शारीरिक, मानसिक स्थैर्य देणारी शक्ती आहे. प्राणायामातून श्‍वासावर नियंत्रण तर होतेच त्याचबरोबर एकाग्रता, चिंतनाची शक्ती विकसित होते. यावेळी त्यांनी विविध आसने उपस्थितांकडून करून घेतले आणि आसनांची अभ्यासपूर्ण माहिती दिली.

या सामुहिक योग साधनेसाठी मोठ्या प्रमाणावर साधक उपस्थित होते.

‘चित्रपट चावडी’तर्फे चित्रपटप्रेमींसाठी शनिवारी ‘सी यु इन माँटेव्हीडीओ’

नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार ०७ जुलै २०१८ रोजी सायंकाळी ६.३०वाजता सुप्रसिद्ध दिग्दर्शक ड्रॅगन जेलो ग्रिलीच यांचा ‘सी यु इन माँटेव्हीडीओ’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
सध्या २०१८ जागतिक फुटबॉल वल्डकपची जोरदार हवा आहे. त्यानिमित्ताने युरोपियन चित्रपट असला तरी कथानक माँटेव्हीडीओ, उरूग्वे, दक्षिण अमेरीका येथे घडते. युगोस्लाव्हीयाची फुटबॉल टीम १९३० साली पहिली जागतिक फुटबॉल स्पर्धा खेळण्यासाठी पात्र होते व माँटेव्हीडीओत दाखल होते. पण मॅचेसआधी व नंतर बर्‍याच गमतीदार नाट्यमय घडामोडी होतात व त्यातून खेळ व मनोरंजन असा एक आनंद रसिकांना मिळतो. सन २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी १४१ मिनिटांचा आहे.
‘सी यु इन माँटेव्हीडीओ’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

Friday 6 July 2018

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर, ग्रंथाली प्रकाशन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'वाचकजागर 'या कार्यक्रमांतर्गत अभिवाचन चळवळीतलं पुढचं पाऊल 'पुस्तकांच्या भेटी' या अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अभिराम पांडे (प्रसिध्द लेखक - दिग्दर्शक), चंद्रकांत मेहेंदळे (ज्येष्ठ अभिनेते), अस्मिता पांडे (प्रसिध्द निवेदिका) आणि श्रीनिवास नार्वेकर (लेखक - दिग्दर्शक) इत्यादी मान्यवरांनी पुस्तक, कथा आणि कवितांच अभिवाचन केले. हा कार्यक्रम नूकताच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, तिसरा मजला, शारदा सिनेमाजवळ, नायगाव, दादर (पुर्व) मुंबई येथे प्रेक्षकांच्या उपस्थित पार पडला.

*शेतकरी कंपन्यांच्या सक्षमीकरणाकरीता दि. 17 जुलै रोजी सीटा संवाद कार्यक्रमाचे आयोजन *




औरंगाबाद :  सीटा (सेंटर फॉर इंटरनॅशनल ट्रेड इन अ‍ॅग्रीकल्चर अ‍ॅण्ड अग्रोबेस्ड इंडस्ट्रिज), यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद व कृषी विज्ञान केंद्र, एमजीएम, औरंगाबाद व कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी कंपन्या वा फार्मर प्रोड्युसर कंपन्या आणि शेतमालाचे ठोक खरेदीदार यांच्यासाठी इ-कॉमर्स प्लॅटफार्मची निर्मिती, शेतकरी कंपन्यांचा सक्षमीकरण या विषयावर सीटा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मंगळवार दि. 17 जुलै 2018 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत सदरील कार्यक्रम आर्यभट्ट सभागृह, जेएनईसी महाविद्यालय, एमजीएम परिसर, औरंगाबाद येथे संपन्न होईल.

या कार्यक्रमात सीटाचे संचालक ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ फिरोज मसानी, ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ विजयअण्णा बोराडे, सीटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील तांबे, दत्ता बाळसराफ आदी मान्यवर आपले विचार व्यक्त करणार आहेत.

शेतकरी कंपन्यांच्या मार्गदर्शनासाठी-प्रकल्प अहवाल तयार करणे, केंद्र व राज्य सरकार तसेच नाबार्डच्या विविध योजना व कार्यक्रमांचा लाभ मिळवणे, सल्लागार सेवा इत्यादी सेवा सिटाच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहेत.  शेतकरी कंपन्या आणि कॉर्पोरेट वा मोठे खरेदीदार यांनी शेतकरी कंपन्यांकडून थेट खरेदी करावी यासाठी इ-कॉमर्सचा प्लॅटफॉर्म उभारण्यासंबंधात सिटा पुढाकार घेणार आहे. ज्या शेतकरी कंपन्या वायदे बाजारात उतरतात त्यांच्यासाठी माहिती सेवा-कमोडिटी इंटेलिजन्स, पुरवण्यासंबंधात सिटा उत्प्रेरकाची भूमिका पार पाडेल. या सर्व अनुषंगाने शेतकरी कंपन्यांना उपरोक्त विषयांची माहिती व्हावी याकरीता या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

शेतकरी, शेतकरी कंपन्या वा शेतकरी गट, शेतमालाचे व्यापारी, शेतमाल प्रक्रिया उद्योग, कृषिउत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व अधिकारी, कमिशन एजंट, नाबार्ड तसेच शेतीकर्ज पुरवठा करणार्‍या बँका, कृषि विद्यापीठातील विस्तार विभागाचे अधिकारी वा प्राध्यापक, कृषी विभागाचे अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

सदरील कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, पूर्व नोंदणी आवश्यक आहे. दि. 15 जुलैपुर्वी इच्छुकांनी वैशाली देशमुख (मो.क्र. 9404738920, 7028167090) या क्रमांकावर अथवा mgmkvk@gmail.com या इमेल आयडीवर संपर्क साधावा. असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत, काकासाहेब सुकासे, जी. आर. रेड्डी, डॉ. ए. के. पांडे,  श्रीकृष्ण सोनवणे, विजय कान्हेकर, सुहास तेंडुलकर, डॉ. रेखा शेळके, सुबोध जाधव आदींनी केले आहे.

Thursday 5 July 2018

विनामूल्य आर्थिक गुंतवणूक मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ आणि संवेदन प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य आर्थिक गुंतवणूक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा नुकतीच यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये संपन्न झाली.

समीर दिघे यांनी वाढती महागाई आणि घटते व्याजदर , वाढत चाललेळे दाम दुप्पट फसव्या योजनांचे प्रमाण, इन्शुरन्स का घ्यावा? का घेऊ नये?, उत्पन्न प्रमाणे आर्थिक शिस्त कशी असावी, नियोजन करताना कसा विचार करावा याविषयांवरती लोकांना उदाहरणासाहित मार्गदर्शन केले.

त्यानंतर दिघे यांनी शेअर बाजार , म्यूचुअल फंड ह्या बाबत सखोल चर्चा केली. तसेच सिप म्हणजे नक्की काय?जेष्ठ नागरिकांच्या दर महिना खरचायला हवे असलेले पैसे आणि त्या पैस्याचा वाढीचा दर ह्याचा समतोल कसा साधावा,जागतिक गुंतवणूक गुरू वॉरेन बफेट ह्यांचे विचार आणि नियम, समृद्ध आर्थिक विकासाच्या दृष्टीने पाउल कसे टाकावे! याबाबतही मार्गदर्शन केले.

Wednesday 4 July 2018

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात पुस्तकांच्या भेटी कार्यक्रम

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर, ग्रंथाली प्रकाशन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवाचन चळवळीतलं पुढचं पाऊल 'पुस्तकांच्या भेटी' या अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अभिराम पांडे (प्रसिध्द लेखक - दिग्दर्शक), चंद्रकांत मेहेंदळे (ज्येष्ठ अभिनेते), अस्मिता पांडे (प्रसिध्द निवेदिका) आणि श्रीनिवास नार्वेकर (लेखक - दिग्दर्शक) इत्यादी मान्यवर अभिवाचन करणार आहेत. हा कार्यक्रम शुक्रवारी ६ जुलै २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, तिसरा मजला, शारदा सिनेमाजवळ, नायगाव, दादर (पुर्व) मुंबई येथे होईल. विश्वास मोकाशी, दत्ता बाळसराफ आणि धनश्री धारप यांनी कार्यक्रमाला अधिक संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन केले आहे. (ग्रंथालीची पुस्तके ४० टक्के सवलतीत उपलब्ध असतील.

Tuesday 3 July 2018

चित्रपट चावडीतर्फे थ्री कलर्स व्हाईट

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद आणि एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडी उपक्रमांतर्गत थ्री कलर्स व्हाईट हा चित्रपट शनिवारी १४ जुलै २०१८ सायंकाळी ६ वाजता आईनस्टाईन सभागृह, एमजीएम परिसर, औरंगाबाद येथे दाखवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिक संख्येने लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन विभागीय केंद्र औरंगाबाद आणि एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय यांच्या तर्फे करण्यात आले आहे. 

Sunday 1 July 2018

विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत श्रवणयंत्र वाटप...

स्टार्की फाऊंडेशन, अमेरिका, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच, आरव्हीएम एज्युकेशनल अॅन्ड चॅरिटेबल फाऊंडेशन, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई, सक्सेरिया फाऊंडेशन मुंबई आणि ठाकरसी ग्रुप मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत श्रवणयंत्र वाटपासाठी कानांची पूर्ण तपासणी शिबीरे विविध ठिकाणी आयोजीत करण्यात आली आहेत.

शिबीर खालील तारिख - ठिकाण प्रमाणे पार पडेल
२ जुलै – संभाजीराजे सभागृह, पंचायत समिती, पुरंदर
३ जुलै – समाधान मंगल कार्यालय, हांडेवाडी, ता. हवेली.
४ जुलै - स्पोर्टस कॉम्प्लेक्स, वारजे, पुणे.
५ जुलै - लोकनेते ना. शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन, धनकवडी, पुणे.
६ जुलै – पौड ग्रामीण रुग्णालय, ता. मुळशी
७ जुलै – राष्ट्रवादी भवन, कसबा, बारामती
८ जुलै – मूकबधीर शाळा, इंदापूर

ज्येष्ठ नागरिकांसाठी परदेशी बनावटीचे कानाच्या मशीनचा लाभ घेण्यासाठी तपासणी व मोजमाप शिबीर तपासणीसाठी येताना ज्येष्ठ नागरिकांकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे – अल्प उत्पन्न गटाचा दाखला, पिवळे / केशरी रेशन कार्ड आणि वय ६० वर्षे पूर्ण असलेबाबातचे प्रमाणपत्र (आधार कार्ड).