Wednesday 24 July 2019

विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्तीचा वापर करून नाविन्याचा शोध घ्यावा - सुनील तांबे

 अमेरिका नावाचा खंड अस्तित्वात आहे याची सुतराम कल्पना कोलंबसला नव्हती. परंतु अमेरिका युरोपियन लोकांच्या कल्पनेत होती. तिची कल्पना त्यांनी केली होती. त्या कल्पनेचा पाठपुरावा करताना अमेरिका त्यांना गवसली. तसेच आपल्या जागेवरून न हलता काही किलोमीटर अंतरावरील माणसाशी आपण बोलू शकतो ही कल्पना ग्रॅहॅम बेलने केली त्यानंतर टेलिफोनचा शोध लागला. जे आजवर कुणालाही ज्ञात नाही अशा अज्ञातातला एखादा कण वा तुकडा शोधायचा असेल तर कल्पना करावी लागते. आणि ती प्रत्यक्षात आणण्याचा ध्यास धरावा लागतो. भारतीयांकडे कल्पनाशक्तीची वानवा आहे. आपल्याला कोकणचा कॅलिफोर्निया करायचा असो, मुंबईचं सिंगापूर वा शांघाय. आपण पाश्चात्यांकडून कल्पना घेतो. आपण नव्या जगाची कल्पना करत नाही.
तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांने या पुढील काळात या आदर्शांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन नाविन्यपूर्ण कल्पना अस्तित्वात आणाव्यात असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार व लेखक सुनील तांबे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेचे द्वितीय पारितोषिक मुंबई येथील के.जे.सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांना मिळाले असून, त्या महाविद्यालयात पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उकरंडे, प्रतिष्ठानचे कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ, उपप्राचार्य डॉ.अनिता पाटील, अंकाच्या संपादक प्रा. वृषाली देवळे उपस्थित होते. नवमहाराष्ट्र्र युवा अभियानाच्या वतीने राज्य संघटक नीलेश राऊत यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मनीषा खिल्लारे, रमेश मोरे यांनी परिश्रम घेतले.



No comments:

Post a Comment